Contact for Advertising
06 September 2026
← Home
Education Breaking News Super Admin 21 August 2026

विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, शिस्त व संवेदनशीलता अंगीकारावी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेतील सभासदांना साडेबारा टक्के लाभांश

पुणे : शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन अस्तित्वाला अर्थ देणारी प्रक्रिया आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविण्यासोबतच जिज्ञासा, चिकाटी आणि शिस्त या मूल्यांची जोपासना केली आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कृतज्ञता हे गुण अंगीकारून त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्था, शिक्षक आणि पालकांप्रती सदैव कृतज्ञ राहावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी (ता. 21) केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सेवक सहकारी पतसंस्था आणि सेवक कल्याण निधीची वार्षिक सर्वसाधारण सभा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केली होती.तसेच विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अँड. संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव ,महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, सेवक सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, शिक्षणाशिवाय व्यक्तीच्या मूल्यांचा आणि संस्कारांचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण माणसाला केवळ साक्षर करत नाही, तर सजग बनवून त्याला जगण्याचा व्यापक दृष्टिकोन देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक यशामागे त्यांची जिद्द, पालकांचा त्याग आणि शिक्षकांची दूरदृष्टी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही स्वर्गीय अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असून महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वाची संस्था आहे. संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. संस्थेला अधिक गती आणि योग्य दिशा देताना स्वर्गीय अजितदादांनी जपलेली पारदर्शकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेची प्रगती वेगाने साधण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना शिस्त आणि पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संस्थेत गैरवर्तन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेबरोबरच संस्थात्मक शिस्त आणि जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. मानद सचिव अँड. संदीप कदम यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास संस्थेचे सभासद, शाखाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.