देहू : माळीनगर येथील भगवान श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने, उत्साहाने आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवासाठी पंचक्रोशीतील तसेच बाहेरगावाहून हजारो भाविकांनी उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले आणि जन्मोत्सवाचा आनंद लुटला.
उत्सवाची सुरुवात पहाटे भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीला मंगलस्नान घालून करण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजन, अभिषेक आणि मंत्रोच्चार करण्यात आले. मंदिरात श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. गीतेतील श्लोकांचे पठण, हरिनामाचा गजर आणि भक्तिगीतांमुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
दुपारी १२ वाजता भगवान श्रीकृष्णांची महाआरती करण्यात आली. आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दुपारी ३ वाजता महिला भजन मंडळाने श्रीकृष्णभक्तीपर भजनांचा सुरेल कार्यक्रम सादर केला.
मंदिर परिसरात श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. गोवर्धन पर्वत, श्रीकृष्ण, गोप-गोपिका, गोकुळातील प्रसंग तसेच बालकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे सुंदर चित्रण करण्यात आले होते. या देखाव्यांनी लहान मुलांसह सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मंदिराच्या आतील भागात करण्यात आलेली मनमोहक फुलांची सजावट, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि आकर्षक धार्मिक सजावटीमुळे मंदिर परिसराचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सायंकाळी हनुमान भजनी मंडळाने भक्तिमय भजनांचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर परमपूज्य महंत अनिल बाबा मराठे महानुभाव यांचे प्रभावी प्रवचन झाले.
आपल्या प्रवचनात महंत अनिल बाबा मराठे यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे सविस्तर विवेचन केले. श्रीकृष्णांचे जीवन हे केवळ धार्मिक कथांपुरते मर्यादित नसून त्यातून जीवन जगण्याची दिशा, कर्तव्यनिष्ठा, सत्य, प्रेम, मैत्री, धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश मिळतो, असे त्यांनी सांगितले. विशेषतः युवकांनी श्रीकृष्णांच्या विचारांचा आदर्श घेऊन व्यसनांपासून दूर राहावे, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांना महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजात एकोपा, बंधुभाव आणि सदाचार वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा संदेशही त्यांनी दिला.
मध्यरात्री बरोबर १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जन्मोत्सवाच्या वेळी मंदिरात विशेष पूजा, मंगलस्नान, पाळणा, आरती आणि छप्पन भोग अर्पण करण्यात आले. नगारा, झांज, टाळ-मृदंग आणि शंखनाद यांच्या गजरात भगवान श्रीकृष्णांचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. जन्माची घोषणा होताच उपस्थित भाविकांनी “जय श्रीकृष्ण”, “गोविंदा गोपाळा” आणि “नंद के घर आनंद भयो” अशा जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून सोडला.
बालकृष्णाच्या पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गीत सादर केले. भाविकांनी श्रद्धेने पाळणा हलवून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. छप्पन भोगाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. जन्मोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी मंदिर परिसरात आनंद, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
लहान मुलांनी कृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजा, आरती आणि भजनांमध्ये सहभाग घेतला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन या उत्सवातून घडले.
भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न . विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्रीकृष्णांचे जीवन हे केवळ धार्मिक कथांपुरते मर्यादित नसून त्यातून जीवन जगण्याची दिशा, कर्तव्यनिष्ठा, सत्य, प्रेम, मैत्री, धैर्य आणि धर्मरक्षणाचा संदेश मिळतो.