देहू: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या 7 जुलै ला देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे.या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शितल उगले यांनी देहूत गुरुवारी(ता.4) भेट दिली. भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी गजानन पाटील, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे,उमेश महाराज मोरे,विश्वस्त वैभव महाराज मोरे,देहू नगरपंचायत चे मुख्याधिकारी चेतन कोंडे,हवेली प्रांताधिकारी यशवंत माने,तहसीलदार जयराज देशमुख,पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर,दिनेश नरवडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त शितल उगले यांनी विविध समस्यांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यात देहू ते देहूरोड या पालखीमार्गावरील कापूर ओढ्यावरील पुलाचे बांधकाम मुदत एप्रिल महिन्यात संपली आहे.मात्र काम पूर्ण झालेले नाही. त्या ठेकेदाराला 30 जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे पत्र द्या. देऊळवाड्याच्या पाठीमागे प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांसाठी मार्ग बनवण्याच्या सूचना दिल्या. संस्थानच्या वतीने रस्ता बनवण्याची मागणी केली होती.
पालखी सोहळ्यातील पहिल्या मुक्काम ठिकाणी व्यवस्था करावी.तसेच पोलीस यंत्रणेकडून क्राउड मॅनेजमेंट करावे. पालखी मार्गावरील कॅन्टोन्मेंट हद्दीतील शनी मंदिर परिसरात पालखी विसाव्यासाठी योग्य नियोजन कॅन्टोन्मेंट बोर्डाने करावे.
पालखी सोहळ्यात योग्य नियोजन करा -शितल उगले
पालखी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना विविध सोयी उपलब्ध करून द्या तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवा